राज्यपाल कोश्यारींना महाराष्ट्राबाहेर काढा – छ.संभाजीराजेंची संतप्त प्रतिक्रिया

 

परभणी :

राज्यपालांच्या “शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आदर्श है..” या वादग्रस्त वक्तव्यावर परभणी दौऱ्यावर असलेल्या छत्रपती संभाजीराजे यांना प्रतिक्रिया विचारली असता, ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी आधी यांना राज्यातून बाहेर पाठवलं पाहिजे. यापूर्वीही मी अशी मागणी केली होती. आताही मोदींना हात जोडून विनंती करतो की,”महाराष्ट्र अशा गोष्टी सहन करणार नाही. किती दिवस आम्ही गप्प बसायचं?अशी व्यक्ती आम्हाला महाराष्ट्रात नको, मोदीजी प्लीज,राज्यपाल कोश्यारींना महाराष्ट्राबाहेर काढा”,अशी संतप्त प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी दिली.

छत्रपती संभाजीराजे पुढे म्हणाले की,राज्यपाल असं का बडबडतात,हे मला समजत नाही.याआधीही त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन हटवावं,अशी मागणी मी पंतप्रधान मोदींकडे केली होती. शिवाजी महाराजांबद्दल ते पूर्वीही बोलले होते. महात्मा फुलेंबद्दलही बोलले होते. इथे येऊन फक्त आमच्या महापुरुषांबद्दल गरळ ओकायची एवढा एकच अजेंडा त्यांनी राबवायचं ठरवलयं का ? असा सवाल करत,अशी व्यक्तीच आम्हाला महाराष्ट्रात नको.छत्रपती शिवाजी महाराज हे या महाराष्ट्राचे वैभव व असंख्य जणांचे प्रेरणास्त्रोत आहेत. महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे. अशा भूमीत,असे घाणेरडे शब्द आणि इतके घाणेरडे विचार या राज्यपालांच्या मनामध्ये येऊच कसे शकतात ? यांना राज्यपाल म्हणून ठेवलंत तरी कसं ? मोदीजी प्लीज, या व्यक्तीला महाराष्ट्रातून बाहेर काढा व त्यांना कुठे ठेवायचे तिथे ठेवा” अशी संतप्त प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजे यांनी याप्रसंगी दिली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. तुलना करुनही ते थांबले नाहीत तर,छत्रपती शिवराय हे जुन्या काळातील आदर्श असल्याचं म्हणत “शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आदर्श है, अभी तुम्हारे सामने नितीन गडकरी जैसे आदर्श है”, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले.त्यांच्या या वक्तव्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. छत्रपती संभाजीराजेंनी तर थेट त्यांना राज्यपालपदावरुन काढण्याची विनंतीच पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे.
—————————————————————————