बारावीत १०० टक्के गुण मिळवत छत्रपती संभाजीनगरची तनिशा राज्यात अव्वल

 

मुंबई/प्रतिनिधी :

बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी २१ मे ला जाहीर झाला असून बारावीत राज्यातील सुमारे ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.यंदाही मुलींनीच बाजी मारली असून पैकीच्या पैकी म्हणजेच १०० टक्के गुण मिळवत छत्रपती संभाजीनगरच्या देवगिरी कॉलेजची तनिशा बोरामणीकर ही विद्यार्थिनी राज्यात अव्वल आली आहे.

राज्यात यंदा बारावीत १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९३.३७ इतकी आहे. एकूण १५४ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल हा १०० टक्के आहे.सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांमध्ये कोकण विभागाचा निकाल हा सर्वाधिक (९७.५१ टक्के) असून सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा (९१.९५टक्के) आहे.

मुलांपेक्षा मुलीच हुशार :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून सर्व विभागीय मंडळातून यावर्षी मुलींचा निकाल ९५.४४ टक्के लागला तर,मुलांचा निकाल ९१.६० टक्के लागला. एकंदरीत,मुलींच्या निकालाची टक्केवारी ही मुलांच्या निकालाच्या टक्केवारी पेक्षा ३.८४ टक्क्याने जास्त आहे.
——————————————————————————
                        : विभागनिहाय टक्केवारी :

* पुणे : ९३.४४ टक्के
* नागपूर : ९२.१२ टक्के
* छत्रपती संभाजीनगर : ९४.०८ टक्के
* मुंबई : ९१.९५ टक्के
* कोल्हापूर : ९४.२४ टक्के
* अमरावती : ९३.०० टक्के
* नाशिक : ९४.७१ टक्के
* लातूर : ९२.३६ टक्के
* कोकण : ९७.५१ टक्के
——————————————————————————