भाजपाने देशात जाती-धर्माचे विष पेरण्याचे पाप केले – महेबूब शेख

 

सांगोला :

                                जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान आणि सुसंस्कृत देश,अशी ओळख असलेल्या आपल्या मातेसम भारत देशात, मीडिया आणि सोशल मीडियाचा गैरवापर करुन सत्ता मिळविण्यासाठी भाजपाने जाती धर्माचे विष पेरण्याचे पाप केल्याची टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी केली.

            सांगोला येथील राष्ट्रवादी भवन येथे आयोजित शरद युवा संवाद यात्रेच्या दरम्यान महेबूब शेख हे बोलत होते.यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील,युवकचे राकेश कामठे,तालुकाध्यक्ष अनिल खटकाळे,माजी नगरसेवक सचिन लोखंडे,अरुण आसबे,गणेश पाटील, मधुकर बनसोडे,चंद्रकांत शिंदे, तानाजीकाका पाटील,रवी चौगुले, अमोल सुरवसे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख पुढे म्हणाले की,सध्या देशात आणि राज्यात सत्तेवर असलेला भारतीय जनता पार्टी हा सर्वात खोटारडा राजकीय पक्ष आहे. जातीधर्माच्या नांवावरुन समाजात तेढ निर्माण करुन हा पक्ष फक्त आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम करतो.केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी आणि शहा यांनी धर्माधर्मात वितुष्ट निर्माण करण्यासाठी ओवेसी सारखे लोक पाळले आहेत.जर तुम्ही खरोखर हिंदुत्ववादी असाल तर,सतत समाज विघातक वक्तव्य करुन सामाजिक शांतता भंग करण्यासाठी गरळ ओकणाऱ्या ओवेसी बंधूवर कारवाई का करत नाही ?,असा सवालही यावेळी शेख यांनी उपस्थित केला. कृषीप्रधान देश अशी ओळख असलेल्या आपल्या देशात खरोखरच बळीराजाचे राज्य आणायचे असेल तर,राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी लावून काम करण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचे विचार गांवोगांवी,घरोघरी पोहोचवून आगामी निवडणुकीत या देश विकायला काढणाऱ्या टोळीला आपण रोखले पाहिजे,असेही महेबूब शेख म्हणाले.

यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील म्हणाले की,आजपर्यंत पक्षाने दिलेला आदेश प्रमाण मानून आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी लावून पक्षाचा प्रसार आणि प्रचार खेडोपाडी व घरोघरी केला आहे. खा.शरद पवार यांचे सांगोला तालुक्यावर पूर्वीपासून विशेष प्रेम राहिले आहे व सांगोलकरांनीही नेहमी तितक्याच ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहण्याची भूमिका घेतली आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत त्याची प्रचिती आली आहे. यापुढील काळातही आम्ही जिद्दीने आणि संपूर्ण ताकदीनिशी खा.शरद पवार यांच्या पाठीशी उभा राहू,अशी ग्वाही दिपकआबांनी शेवटी व्यक्त केली.

————————————————

कुटुंबातील सदस्याप्रमाणेच कार्यकर्त्यांचीही काळजी घेत असतो :

         स्व.आमदार काकासाहेब साळुंखे- पाटील आणि स्व.ह.भ.प.शारदादेवी साळुंखे-पाटील (काकी) यांनी दिलेल्या शिकवणीनुसार आम्ही सांगोला तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा निव्वळ राजकीय पक्ष म्हणून काम करत नाही तर,हे संपूर्ण आपले कुटुंब आहे. या कुटुंबातील प्रत्येकाची सुख-दुःखे ही आपली आहेत, याच भावनेतून काम करत आहोत. स्व.आमदार काकासाहेब यांच्यापासून आपण हा वारसा जपला आहे. एक कुटुंबातील सदस्य याप्रमाणेच पक्षातील कार्यकर्त्यांची नेहमी काळजी घेत असतो आणि कार्यकर्ताही त्याच जीवाभावाने आपल्या सोबत राहतो.                       – दिपकआबा साळुंखे-पाटील
                                —————————————

एम.आय.एम.म्हणजे “मोदी इम्पोर्ट मेंबर” :

एम.आय.एम हा केवळ जातीधर्मात विष कालवून सामाजिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने स्थापन झाला असून एम.आय.एम हा राजकीय पक्ष नसून ओवैसी बंधू हे “मोदी इम्पोर्ट मेंबर” आहेत.                                                     – युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख

—————————————————————————