सांगोला नगरपरिषदेतर्फे हर घर तिरंगा अंतर्गत राखी बनवणे व रांगोळी स्पर्धेचे यशस्वी आयोजन

सांगोला :

संपूर्ण देशभर २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान “हर घर तिरंगा” मोहीम राबविण्यात येत आहे.या अनुषंगाने सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हर घर तिरंगा अभियानांतर्गत सांगोला नगरपरिषदेमध्ये राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM) विभागामार्फत बचत गटातील महिलांसाठी तिरंगा राखी बनवण्याच्या स्पर्धेसह विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत महिलांसह शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.स्पर्धेदरम्यान महिलांनी तिरंग्याच्या रंगांवर आधारित आकर्षक आणि सर्जनशील राख्या तयार केल्या.तर,रांगोळी स्पर्धेतील सहभागींनी तिरंगा,राष्ट्रध्वज,देशभक्तीवर आधारित रांगोळी साकारल्या. ज्यामध्ये भारतीय राष्ट्रध्वजाचे प्रतीक असलेले केशरी,पांढरे आणि हिरवे रंग तसेच अशोकचक्र यांचा समावेश होता.

या स्पर्धेचे उद्दिष्ट केवळ देशभक्तीचे वातावरण निर्माण करणे एवढेच नव्हते,तर स्थानिक बचत गटातील महिलांना व शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कौशल्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देणे हे होते.या बनविलेल्या राख्या सैनिकांना पाठवण्याची व्यवस्था डाक विभागाच्या सहकार्याने करण्यात आली असून स्पर्धेच्या विजेत्या महिला व शालेय विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

यावेळी सांगोला नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक सचिन पाडे,पोस्ट मास्तर हनुमंत निंबाळकर तसेच सांगोला नगरपरिषदेचे अधिकारी रोहीत गाडे श्रीम.अस्मिता निकम,श्रीम.प्रियांका पाटील,प्रभाकर कांबळे,सहा प्रकल्प अधिकारी योगेश गंगाधरे इ. अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यासोबतच, अभियानाच्या वेगवेगळ्या टप्प्यात (२ ते १५ ऑगस्ट २०२५) सांगोला नगरपरिषदेतर्फे तिरंगा पदयात्रा, तिरंगा बाईक रॅली आणि स्वच्छता मोहीम यांसारखे इतर उपक्रमही राबवले जाणार आहेत,ज्यामुळे शहरात तिरंगामय वातावरण निर्माण होईल,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
——————————————————————————