भविष्यात वारी व वारकरी ही परंपरा कायम चालूच राहणार आहे – दीपकआबा साळुंखे-पाटील

वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी,औषधोपचार व अन्नदान

सांगोला :

पंढरपूरच्या पांडुरंगाच्या आषाढी वारीच्या निमित्ताने दिंडीतील साधु-संतांची सेवा करण्याचे भाग्य लाभले. पाचेगाव खुर्द गावातील सर्व क्षेत्रातील लोक वारीच्या पूर्वी पांडुरंगाचा प्रपंच उभा करतात. या निमित्ताने वारकऱ्यांची आरोग्य तपासणी व औषधोपचार तसेच वारकऱ्यांसाठी नाष्टा,चहा,जेवण दिले जाते. स्व.शारदाकाकी साळुंखे-पाटील या वारकरी संप्रदायातील असल्याने त्यांचा वारसा आम्हालाही मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वृद्ध महिला वारकरी शांताबाई मगदूम यांच्या हस्ते वैद्यकीय कक्षाचे उदघाटन करण्यात आले.पांडुरंगाचे दर्शन व सेवा हेच वारकऱ्यांचे वैभव आहे.भविष्यात वारी व वारकरी ही परंपरा कायम चालूच राहणार आहे,असे विचार माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी पाचेगाव खुर्द येथे व्यक्त केले.

याप्रसंगी,मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी डॉ.अविनाश खांडेकर यांची तर,वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पंढरपूर विभागाच्या प्रमुखपदी सतीशभाऊ सावंत आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार रामाजी महाराज मठ मठाधिपती ह. भ.प.कृष्णाजी कदम महाराज ढालगांवकर यांचा दीपकआबा साळुंखे-पाटील चॅरिटेबल ट्रस्ट पाचेगाव खुर्द,ग्रामपंचायत पाचेगाव व विकास सेवा सोसायटी यांच्या वतीने मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दीपकआबा साळुंखे-पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पाचेगाव येथे सलग १५ वर्षे आषाढी वारीनिमित्त दिंडीतील वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार करण्यात येतात.याचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.याप्रसंगी, दीपकआबा साळुंखे-पाटील हे बोलत होते.

यावेळी बोलताना दीपकआबा साळुंखे-पाटील पुढे म्हणाले की,सर्वांना सामावून घेणारा देव म्हणजे पांडुरंग होय.वारी व वारकऱ्यांची परंपरा अखंडपणे चालू आहे. परमेश्वर भक्ताकडे कांहीच मागत नाही,तो फक्त भक्तीचा भुकेला आहे. ट्रस्टच्या वतीने प्रत्येक वर्षी ५ मान्यवरांचे सत्कार ठेवण्यात येतील. या गावातील एकोपा व त्यातून घडणारे सत्कार्य याला विशेष महत्त्व आहे.यावेळी,डॉ.राज मिसाळ म्हणाले की,वारकरी सेवेचे हे १६ वे वर्ष आहे.तर,वैद्यकीय सेवेचे १४ वे वर्षे आहे.या सर्व सेवेची प्रसिध्दी देण्याचे काम दै.सांगोला नगरी व दै.माणदेश नगरीच्या माध्यमातून संपादक सतीशभाऊ सावंत हे करीत आहेत.वारकऱ्यांसाठी समाजसेवा,आरोग्य तपासणी व उपचार केले जात आहेत.तसेच दिंडीतील ‌ वारकऱ्यांसाठी चहा,नाश्ता व जेवणाची व्यवस्था केली जात आहे.

यावेळी प्रस्ताविकात हरिभाऊ भगत सर म्हणाले की,दक्षिण महाराष्ट्रातील वारकरी दिंड्या पंढरपूरकडे आषाढी वारीच्या निमित्ताने जात असतात. पाचेगाव हे पुण्यनगरी गांव आहे. आम्ही कोणालाही वर्गणी मागत नसून देणाऱ्यांचे हात असंख्य आहेत.अन्नदान, आरोग्यसेवा व वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी या निमित्ताने आमच्या गावाला मिळत आहे,हेच आमचे भाग्य आहे .यावेळी डॉ.शिवाजीराव ढोबळे म्हणाले की,माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील वारकरी संप्रदायातीलच आहेत.स्व.शारदाकाकी साळुंखे-पाटील यांचा वारसा पुढे दीपकआबा चालवत आहेत.भविष्यात आरोग्य शिबिराची व्याप्ती वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

या कार्यक्रमासाठी ह.भ.प.पोपट घुले,माजी जि.प. सदस्य दादासाहेब बाबर,सरपंच संगीता भोसले, मुरलीधर जवंजाळ,आबासाहेब भंडगे,निवृत्ती मिसाळ गुरुजी,स्वराज कलेक्शनचे माजी सैनिक अजितराव खराडे,ह.भ.प.शांताबाई मगदूम यांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमासाठी माजी सरपंच गोरखनाथ भोसले,पोपट मिसाळ,शिवाजी पाटील व पाचेगावातील विविध क्षेत्रातील मान्यवर,पदाधिकारी, शेतकरी बांधव, युवावर्ग व महिला भगिनी यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.
——————————————————————————