डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे समाजात समता व बंधुता प्रस्थापित झाली – दीपकआबा साळुंखे-पाटील

जवळा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
सांगोला :
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ आपल्या देशाचेच नाहीतर,संपूर्ण जगाचे भूषण होते.आपल्या हयातीत त्यांनी दीन,दलित,उपेक्षित व समाजातील दुर्लक्षित घटकांना न्याय देण्याची भूमिका घेतली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आज समाजात समता व बंधुता प्रस्थापित झाली असल्याचे मत माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी व्यक्त केले.
सांगोला तालुक्यातील जवळा येथील जुना राजवाडा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना ते बोलत होते.यावेळी माजी सभापती साहेबराव देशमुख व जवळा गावचे सरपंच सज्जन मागाडे यांच्यासह ग्रामस्थ व समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी बोलताना दीपकआबा पुढे म्हणाले की,देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली जनजागृती महत्वाची ठरली आणि स्वातंत्र्यानंतर देशातील प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देण्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी खऱ्या अर्थाने आपले योगदान दिले.वेशीच्या बाहेर उपेक्षित आणि वंचित म्हणून ज्यांनी आपली हयात घालवली,आज त्यांचेच वारस राजाच्या हवेलीप्रमाणे गावकुसात स्वाभिमानाने जीवन जगत आहेत,हे सर्व श्रेय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जाते.
दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी सांगोला शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकालाही पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले.यावेळी आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख,निवृत्त पोलीस अधिकारी भरत शेळके आदी उपस्थित होते.
——————————————————————————
डॉ.बाबासाहेबांचे सांगोला तालुक्याशी जिव्हाळ्याचे सबंध
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सांगोला तालुक्यातील तत्कालीन अनेक लोकांशी जवळचे व जिव्हाळ्याचे संबंध होते.बलवडी येथील लिगाडे सरकार परिवाराचे व कोळा येथील अनेक लोकांशी त्यांचे संबंध होते.म्हणूनच कोळा येथे त्यांचा वारसा जतन करण्यासाठी अस्थीकलश ठेवण्यात आले आहे. त्यामुळे,यामधून आजही अनेकाना प्रेरणा मिळते.