राजकीय जीवनातील अखेरची निवडणूक असल्याने आपल्या अनमोल मताचे दान माझ्या पदरात टाकावे – आमदार शहाजीबापू पाटील

 आ.शहाजीबापू पाटील यांनी बलवडीत श्री सिध्दनाथाचे दर्शन घेवून फोडला प्रचाराचा नारळ

 

सांगोला :

       १९९० मध्ये मी राजकीय जीवनास सुरुवात केली. ज्यावेळी स्व.आमदार गणपतराव देशमुख यांच्या विरोधात उभा राहण्यास कोणी तयार नव्हते,अशावेळी त्यांच्या विरोधात तब्बल ७ निवडणुका पार पाडल्या. आज मात्र,तालुक्यात विधानसभा निवडणूक लढवायला चढाओढ लागली आहे.यापूर्वी तुम्ही विधानसभा निवडणूक लढला असता तर,मी तुमचा प्रचार केला असता,असे सांगून आजपर्यंतच्या निवडणुका या सांगोला तालुक्याच्या विकासासाठी लढविल्या व तालुक्यात शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला.तसेच भविष्यात तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा,यासाठी तालुक्यामध्ये मोठी एमआयडीसी आणण्यासाठी व उर्वरित विकास कामे पूर्ण करण्यासाठी येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये तालुक्यातील बंधू-भगिनींनी धनुष्यबाणासमोरील बटन दाबून मला भरघोस मतांनी निवडून द्यावे,असे म्हणत, माझ्या आजपर्यंतच्या राजकीय जीवनाचा सन्मान राखण्यासाठी प्रत्येक मतदाराने रात्रीचा दिवस करावा. माझ्या राजकीय जीवनातील ही शेवटची निवडणूक असून मतदारांनी आपल्या अनमोल मताचे दान माझ्या पदरात टाकावे,असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी बलवडी येथे केले.

    २५३-सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ बलवडी येथे श्री सिद्धनाथाचे दर्शन घेवून व श्रीफळ वाढवून करण्यात आला.यावेळी बलवडी गावात आमदार शहाजीबापू पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी सांगोला तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी,महायुतीचे अनेक मान्यवर, नेतेमंडळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर चोपडीचे उपसरपंच पोपट यादव,शिंदेसेनेचे सांगोला विधानसभा प्रमुख प्रा.संजय देशमुख,ग्रा.पं.सदस्य दिनेश बाबर,लोकनियुक्त सरपंच माऊली राऊत,उपसरपंच रविराज शिंदे,चेअरमन दगडू बाबर,रमेश शिंदे गुरुजी,सचिन धायगुडे,लक्ष्मण भोसले,दिगंबर धायगुडे,अर्जुन धायगुडे,प्रसाद शिंदे, गणेश कमले,संतोष खुळपे,बाळासाहेब विश्वनाथ शिंदे, माजी सरपंच उत्तम सरगर,राजू पाटील,वसंत पाटील, सरपंच मल्हारी चव्हाण,उपसरपंच वाघमारे,राजू खरात, ग्रा.पं.सदस्य के.आर.वाघमारे जीवन कांबळे,अजय सरगर,मंगेश रायचूरे,राजुरीचे माजी सरपंच रामा दबडे आदी उपस्थित होते.

                 यावेळी बोलताना आम.शहाजीबापू पाटील पुढे म्हणाले की,माझा संसार पणाला लावला पण, तालुक्यातील माझ्या तमाम जनतेचा संसार फुलवला.  विरोधक म्हणतात, “मोठा बंगला बांधला पण,त्यांचे किती बंगले आहेत ? हे मोजायलाही घावत नाहीत.” तसेच विकास कागदावरच आहे,असे म्हणतात.मी तयार केलेली विकासकामांची पुस्तिका पाहून चौकशी करावी,मग बोलावे.त्यांच्या भूलथापांना मतदार बळी पडणार नाही,याची खात्री आहे.विरोधक फक्त टीका करण्याचे काम करतात,टीकेशिवाय त्यांच्याकडे प्रचाराचा मुद्दाच नाही.दुष्काळी सांगोला तालुका हा कलंक पुसण्यासाठी पाण्याच्या अनेक योजना मंजूर करुन आणल्या.त्यामुळे,तालुक्यातील एक गावही पाण्यापासून वंचित राहणार नाही,याची स्वतः खबरदारी घेतली आहे.सांगोला तालुका सुजलाम, सुफलाम करण्यासाठी घेतलेले कष्ट,त्याचे मिळालेले फळ व आनंद हा वेगळाच आहे.महायुती सरकारने महाराष्ट्रासाठी अनेक विकासाच्या योजना आणल्या. अनेक प्रकल्प उभा केले व राज्यातील जनतेला कशाचीही उणीव भासू दिली नाही. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेसाठी प्रत्येक महिलेला १ हजार ५०० रुपये देऊन महिला भगिनींचा सन्मान केला.अशी योजना यापूर्वी झाली नाही व भविष्यातही होणार नाही,असे सांगून आ.शहाजीबापू पुढे म्हणाले की,तालुक्यासाठी तब्बल ५ हजार कोटीहून अधिक निधी खेचून आणून तालुक्याला एका विकासाच्या शिखरावर पोहोचवण्याचं काम केले असून जीवनात याच्यासारखा दुसरा आनंद नाही,असे मत आमदार शहाजीबापू पाटील यांनी यासमयी व्यक्त केले.

                     यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीकांतदादा देशमुख, साहेबराव शिंदे,शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजयदादा शिंदे,  ॲड.विक्रमसिंह पाटील, माजी सरपंच बाळासाहेब शिंदे,महादेव शिंदे,होलार समाज मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष दीपक ऐवळे, शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे,युवा नेते अजिंक्य शिंदे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,सांगोला तालुक्यातील स्वाभिमानी जनतेच्या विकासासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी टेंभू,म्हैसाळ,उजनी, यासह स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना राबवण्यासाठी जीवाचे रान केले.तालुक्याला लागलेला दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी आमदार शहाजीबापू यांनी संघर्ष केला.सांगोला तालुक्यासह राज्यामध्ये आ.शहाजीबापू यांचा उल्लेख “पाणीदार आमदार” म्हणून केला जातो. आमदार शहाजीबापू पाटील यांनी तालुक्यात केलेली कामे विरोधकांना मोजताही येणार नाहीत.  विरोधकांनी टीका करण्यापेक्षा स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. तालुक्यातील जनतेसाठी तुम्ही काय केले ? हे अगोदर सांगा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारने अल्पसंख्यांकांसाठी भरीव असा निधी दिला. सांगोला तालुक्यामध्ये ॲड. शहाजीबापू यांच्यासारखा आमदार यापुढे होणार नाही. बापूंमुळे तालुक्याचे वैभव वाढले आहे.बलवडी गावातून अधिकाधिक मतदान देण्यासाठी जीवाचे रान करु.परमेश्वराने आ.शहाजीबापूंना आजारपणातून सही सलामत बाहेर काढले,ते केवळ तालुक्याच्या सेवेसाठीच.तालुक्याची सेवा करण्याचे कार्य परमेश्वराने बापूंना दिले आहे.तत्कालीन आमदारांनी पाण्यासाठी पाणी परिषदा घेतल्या, पण पाणी तर आलेच नाही. विरोधकाकडे निवडणुकीत विकास नावाचा अजेंडाच पाहायला मिळत नाही. २०१९ साली आमदार शहाजीबापू पाटील निवडून आल्यानंतर ज्यांना छोटा भाऊ मानलं,त्याच भावाने निवडणुकीत विरोधात दंड थोपटले.तालुक्यात ५ वर्षात झालेल्या विकासाचे श्रेय हे बापूंचेच आहे.न केलेल्या कामाचे श्रेय विरोधकांनी घेऊ नये,असा टोलाही सर्वच वक्त्यांनी लगावला.

——————————————

एमआयडीसीमध्ये गोरगरीब कुटुंबातील मुलांच्या हाताला काम देण्याचे कार्य केले जाईल :

          आमदार शहाजीबापू पाटील हे राजकारणात आल्यापासून त्यांच्यासोबत राजकीय जीवनात प्रामाणिकपणे काम केले.या निवडणुकीत चिकमहुद व बलवडी गावातून होणाऱ्या मतदानामध्ये बलवडी गाव सरस होणार आहे. आमच्या बलवडी गावचा विकास करण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे लक्ष दिले. तालुक्यातील शेतकरी समृद्ध झाला तरच,खऱ्या अर्थाने विकासाला चालना मिळणार आहे.बलवडी गावातील श्री.सिद्धनाथाचे चरणी श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला,हे गावचे भाग्य आहे. शहाजीबापूंच्या माध्यमातून तालुक्यात मोठी एमआयडीसी आणायची आहे,सुशिक्षित तरुणांसाठी बलवडी गावांमध्ये स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी मोठी लायब्ररी सुरु करण्याचा माणस आहे.या एमआयडीसीमध्ये गोरगरीब कुटुंबातील मुलांच्या हाताला काम देण्याचे कार्य केले जाईल.                                – विजयदादा शिंदे (शिवसेना नेते)