एक गुंठाही क्षेत्र शेतीच्या पाण्यापासून आणि कुणी एक व्यक्तीही पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही – माजी आमदार दीपकआबा

 

सांगोला :

मी स्वत: व आमदार शहाजीबापू पाटील हे माढा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील रखडलेल्या सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी कटिबध्द असून तालुक्यातील एक गुंठाही क्षेत्र शेतीच्या पाण्यापासून आणि कुणी एक व्यक्तीही पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी सावे येथे गांवभेट दौर्‍यावेळी दिली.

शुक्रवारी ३ मे रोजी महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सावे येथे आयोजित गावभेट दौऱ्यात ते बोलत होते.यावेळी खा.निंबाळकर यांचे मेहुणे संग्रामसिंह जाधव,युवा सेनेचे संपर्क प्रमुख सागर पाटील,शहर अध्यक्ष तानाजीकाका पाटील,सावे गावचे युवा नेते शाहूराजे मेटकरी,शिवाजी जावीर,दिपक ऐवळे,दिपक दिघे आदींसह सावे गावातील नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी आमदार दीपकआबा पुढे म्हणाले की,सांगोला तालुक्यातील रखडलेल्या सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी आमची लढाई सुरु आहे. आपला खासदार हा केंद्रात ज्या पक्षाची सत्ता आहे त्याच पक्षाचा असेल तर, विकासकामे वेगाने होण्यास मदत होते,हे आपण गेल्या ५ वर्षांत पाहिले आहे.खा.निंबाळकर यांनी सांगोला तालुक्याच्या विकास कामांना नेहमीच प्राधान्य दिले.ज्यांनी आपल्या विकासाला साथ दिली, आपणही त्यांनाच साथ द्यावी,असे आवाहन करुन दीपकआबा पुढे म्हणाले की, सध्या देशाच्या सर्वोच्च सभागृहाची अर्थात लोकशाहीची निवडणूक सुरु असून देशाचे भवितव्य आणि देशाचा नेता ठरवण्याची ही निवडणूक आहे.या निवडणुकीत सांगोला तालुक्यातील सावे येथील ग्रामस्थ कोणत्याही भूलथापांना बळी न पडता विकासाला साथ देतील व महायुतीचा उमेदवार असलेल्या खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना सावे गावातून प्रचंड मताधिक्य देतील,असा विश्वास माजी आमदार दीपकआबा यांनी यावेळी व्यक्त केला.

—————————————————————————
माण नदीला पाणी सोडल्याबद्दल दीपकआबांचे अभूतपूर्व स्वागत व सत्कार :

दुष्काळी परिस्थितीत माण नदीला टेंभूचे पाणी सोडल्याबद्दल सावे गावातील शेकडो ग्रामस्थांनी माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांचे अभूतपूर्व स्वागत केले. तसेच गांव व परिसरातून दीपकआबांची सवाद्य आणि जंगी मिरवणूक काढण्यात आली. दुष्काळी परिस्थितीत नागरिकांसह पशुपक्ष्यांना जीवनदान दिले म्हणून ग्रामस्थांनी माजी आमदार दीपकआबांचा काठी आणि घोंगडं देऊन सत्कार केला.
———————————————————————————