सांगोला :
राहती घरे आगीत जळून खाक झाल्यामुळे उघड्यावर पडलेल्या जवळा येथील धुमाळ वस्तीतील साळुंखे कुटुंबियांना आपुलकी प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात दिला आहे.
सांगोला तालुक्यातील जवळा परिसरातील धुमाळ वस्ती येथील रहिवासी असलेले संभाजी मसू साळुंखे व त्यांची मुले संजय व विजय साळुंखे यांच्या राहत्या घरी आग लागून त्यांची घरे पूर्णपणे जळून खाक झाली.संपूर्ण साळुंखे कुटुंबीय हे दररोज रोजंदारीवर कामाला जातात.अतिशय गरीब परिस्थिती असलेल्या या कुटुंबातील लोक हे गुरुवारी नेहमीप्रमाणे रोजंदारीने कामाला गेले होते.यावेळी अचानक घराला आग लागल्याने ही दुर्दैवी घटना घडली आणि या आगीमध्ये घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्यामुळे वरील तिन्ही कुटूंबे उघड्यावर आली. ही घटना समजल्यानंतर सांगोला येथील आपुलकी प्रतिष्ठानकडून त्यांना टॉवेल,चादर,सतरंजी,लहान मुलांना कपडे तसेच १ महिना पुरेल असा सर्व किराणा माल देऊन आपुलकी जोपासली आहे.
यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव,सचिव संतोष महिमकर,प्रभाकर सरगर, प्रमोद दौंडे, इंजि.विकास देशपांडे,उमेश चांडोले,सुनिल मारडे,अमर कुलकर्णी,शरद कोळवले आदींसह सामाजिक कार्यकर्ते रमेश साळुंखे व संभाजी साळुंखे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.
—————————————————————————
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने