भरुन वाहणारे राजेवाडी तलावाचे पाणी सांगोला तालुक्यातील शेतीसाठी सोडण्यात यावे – माजी आम.शहाजीबापू पाटील

सांगोला :

राजेवाडी तलाव भरुन तलावातून पाणी बाहेर वाहू लागले असून हे वाहणारे पाणी सांगोला तालुक्यातील कॅनॉल,तलाव,बंधारे, ओढे व नाले भरण्यासाठी सोडण्यात यावे,अशी मागणी सांगोला तालुक्याचे माजी आम.शहाजीबापू पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचेकडे नुकतीच केली आहे.

राज्यात यावर्षी मे महिन्यातच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने उन्हाळ्याची तीव्रता कमी झाली असून माण खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानंतर माण नदीला भरपूर प्रमाणात पाणी आल्याने राजेवाडी तलाव भरुन तलावातून बाहेर पाणी वाहू लागले आहे.हे वाहणारे पाणी सांगोला तालुक्यातील कॅनॉल,तलाव,बंधारे, ओढे व नाले भरण्यासाठी वापरण्यात यावे.सध्या समाधानकारक पाऊस झाला असला तरी भविष्यात पाऊस लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे राजेवाडी तलावातून वाहणारे पाणी तालुक्यातील शेतीसाठी उपयोगात आणणे गरजेचे आहे.भविष्यात त्याचा उपयोग खरीप हंगामातील शेती पिकांना होणार आहे.त्यामुळे,या मागणीचा विचार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी करुन अधिकाऱ्यांना तसे आदेश द्यावेत, अशी मागणी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली आहे.

माण खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने माण नदीलाही भरपूर पाणी आले आहे.सध्या राजेवाडी तलाव भरल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे.हे वाहून जाणारे पाणी सांगोला तालुक्यातील कॅनॉल,तलाव,नाले व ओढे भरण्यासाठी वापरण्यात यावे. त्यामुळे भविष्यात सध्या पेरणी होत असलेल्या पिकांसाठी त्याचा वापर होईल.तरी,या मागणीचा विचार करुन तलावातून वाहून जाणारे पाणी सांगोला तालुक्यासाठी उपलब्ध करुन देण्यात यावे.सध्या माण नदीतूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे.याचा उपयोग तालुक्यातील इतर गावातील तलाव, कॅनॉल,नाले,ओढे भरण्यासाठी करण्यात यावा,असे शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
——————————————————————————