टेंभू व म्हैसाळ योजनेतून रब्बी हंगामाचे आवर्तन पूर्ण क्षमतेने होणार – आम.शहाजीबापू पाटील

 

सांगोला :

टेंभूचे पाणी हे येत्या १५ जानेवारीपर्यंत सांगोला तालुक्यात पोहोचेल तसेच टेंभू व म्हैसाळ योजनेतून यंदा रब्बी हंगामासाठी सांगोला तालुक्यातील शेतीसाठी पूर्ण क्षमतेने आवर्तन होणार असल्याची माहिती आम.शहाजीबापू पाटील यांनी दिली.

कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजना व टेंभू उपसा सिंचन योजना या योजना अंतर्गत कालवा सल्लागार समितीची बैठक काल रविवारी जिल्हाधिकारी कार्यालय,सांगली येथे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.सुरेशभाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यामध्ये सांगोला तालुक्याचे आम.शहाजीबापू पाटील यांनी टेल टू हेड पाणी मिळण्यासाठी नियोजन करावे, त्याचबरोबर,आवर्तन चालू असताना आवर्तन यशस्वी होण्यासाठी अधिकाऱ्याने त्या ठिकाणी उपस्थित रहावे,अशा सूचना दिल्या.

यावेळी अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगीतले की, रब्बी हंगामाचे म्हैसाळ योजनेचे पंप १७ नोव्हेंबर रोजी चालू होतील व टेंभू योजनेचे रब्बी हंगामाचे पंप १५ डिसेंबर रोजी चालू होतील.टेंभूचे पाणी हे १५ जानेवारी पर्यंत सांगोला तालुक्यामध्ये पोहोचेल. या पाण्यामधून दोन्ही योजनांतील रब्बी हंगाम आवर्तन यशस्वी केले जाईल,असे सांगीतले.

             या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीसाठी पालकमंत्री नाम.सुरेशभाऊ खाडे,खासदार संजय काका पाटील,आम.शहाजीबापू पाटील,आम.अनिल भाऊ बाबर,आम.सुमनताई पाटील,आम.विश्वजीत कदम,आम.समाधान आवताडे,आम.विक्रम सावंत, आम.अरुण लाड,आम.गोपीचंद पडळकर,माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील,माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह या दोन्ही योजनांच्या विभागातील सर्व अधिकारी उपस्थित होते.
—————————————————————————